भीमाशंकर, आहुपे व पाटण खोर्‍यात पावसाचे थैमान   

१८ गावांचा संपर्क तुटला
 
मंचर, (वार्ताहर) : भीमाशंकर, आहुपे व पाटण खोर्‍यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सोमवारी मुसळधार पावसाने अनेक गावांमध्ये ठिकठिकाणी दरड कोसळून वाहतूक बंद झाली. पाटण ते आहुपे परिसरातील १८ गावांचा संपर्क तुटला आहे. कोंढवळ गावच्या रस्त्याला दरड कोसळल्याने संपर्क तुटला आहे. डिंभे ते आहुपे याही परिसरातील १५ गावांचा संपर्क तुटला आहे. तर भातखाचरांचे बाध तुटले आहेत. जनावरांचा चारा पुर्णता वाया गेला आहे. सर्वत्र पाणी पाणी होऊन भातखाचरांना तळ्याचे स्वरुप आले आहे. आदिवासी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
 
 भीमाशंकर, आहुपे व पाटण खोर्‍यात रविवारी दुपारपासुन मुसळधार पावसाने  हजेरी लावली आहे. त्यामुळे आदिवासी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच आदिवासी भागामध्ये मागील आठवडाभर वादळी वारा व अवकाळी पावसाने पश्चिम भाग झोडपून काढला आहे. पावसाने उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या बाळ हिरडा, पावसाळ्यातील चुलीसाठीचे फाटी, जणावरांचा चारा, भात रोपांसाठी ठेवलेला पेंढा याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे त्वरीत पंचनामे करावे, अशी मागणी आदिवासी बांधव करत आहेत. 
 
 नुकसान ग्रस्त भागाची तातडीने पाहणी आदिवासी नेते सुभाष मोरमारे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी ,बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, मारुती लोहकरे, सविता दाते, हनुमंत इष्टे यांनी माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार केली.
 

Related Articles